आषाढी वारीसाठी वैद्यकीय सुविधा, टोलमाफी, रुग्णवाहिका, आयसीयू, नोडल अधिकारी आणि स्वच्छतेवर भर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
मुंबई : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य शासनातर्फे समूह विमा योजना राबवण्यात येणार असून, यंदाही वारी मार्गावर आरोग्य सुविधा, टोलमाफी आणि अन्य आवश्यक व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहात वारीपूर्व तयारीसंदर्भात एक विशेष आढावा बैठक पार पडली. यावेळी वारीदरम्यान वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांचा आढावा घेण्यात आला.
अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागांत वारी मार्ग खराब झाला असल्यास, तेथे तातडीने मुरूम, खडी व डांबरीकरण करून डागडुजी करण्यात यावी, असे आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
त्याचबरोबर वारी मार्गावर वारकऱ्यांसाठी मुबलक पिण्याचे पाणी, विजेची सोय आणि पालखी तळांवर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वरीसाठी जाणाऱ्या वाहनांना दरवर्षीप्रमाणे यंदाही टोलमध्ये सवलत दिली जाणार आहे.
राज्याच्या आरोग्य विभागामार्फत यंदाही भव्य आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. वारकऱ्यांसाठी कार्डिऍक रुग्णवाहिका, पंढरपूरमध्ये तात्पुरता आयसीयू विभाग, तसेच प्रत्येक मोठ्या दिंडीसोबत पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका ठेवण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
या संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला भेट द्यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. वारीदरम्यान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासन मदत देणार असून, पोलिस प्रशासनासोबत योग्य समन्वय राखण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहेत.
वारी कुठे अडथळा न येता सुरळीत पार पडावी, यासाठी भोजन व्यवस्था, परंपरागत विधी आणि यात्रेचा वेळेत प्रवास यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
‘स्वच्छ वारी – निर्मल वारी – हरित वारी’चा संकल्प : यंदाची वारी ‘स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ या संकल्पनेवर आधारित पार पडावी यासाठी शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
