अकलुजच्या शेतातील गोठ्यात ९ दिवस डांबले : १२ गुंतवणूकदारांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सोलापूर, अकलुज परिसरात शेकडो लोकांना ‘बुल्स कॅपिटल’मार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची १२०० कोटींची फसवणूक करणाऱ्या इम्रान चौधरीचे काही जणांनी अपहरण करून अकलुजच्या शेतात ९ दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी १२ जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत इम्रान नदीम चौधरी (वय ३१, रा. पेटी कोर्ट यार्ड सोसायटी, जुना मुंढवा रोड, चंदननगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चैतन्य तोरसकर, लकी, अण्णा, अजित तोरसकर, मेजर, अक्षय, राजा नाईकवडी (सर्व रा. अकलुज) आणि त्यांच्या ४ ते ५ सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार २४ मे ते १ जून दरम्यान सुंदराबाई मराठे शाळा व अकलुज येथील एका शेतातील जनावरांच्या गोठ्यात घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इम्रान चौधरी, त्याचा भाऊ सलमान, आणि मित्र कुटे यांनी ‘बुल कॅपिटल’ या कंपनीची स्थापना करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ, असे आमिष दाखवून सोलापूर, अकलुज भागातील शेकडो लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले.
त्यानंतर त्यांनी पैसे परत करण्यास नकार दिला. फिर्यादी हे त्यांच्या कारने जात असताना, पाठीमागून आलेल्या कारमधील लोकांनी त्यांना गाडी जबरदस्तीने थांबविण्यास भाग पाडले. ‘बुल कॅपिटल’ या कंपनीत गुंतवणूक केलेले पैसे परत करण्याची मागणी केली. त्यांच्या गाडीचा ताबा घेऊन त्यांना फिनिक्स मॉलसमोर आणले.
त्यांना शिवीगाळ करून, “आमचे घेतलेले पैसे माघारी दे,” असे सांगून, त्यांना गाडीत घालून जबरदस्तीने अकलुज येथील एका शेतातील जनावरांच्या गोठ्यात डांबले. त्यांच्या अंगावरील कपडे काढून लाकडी दांडके, पाइप, रॉडने मारहाण केली.
याबाबत चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी सांगितले की, “आपले अपहरण करून मारहाण केल्याचे इम्रान चौधरी सांगतो, परंतु त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत नाहीत.
अपहरणकर्त्यांनी नंतर त्याला सोडून दिले, असे तो सांगतो. त्यानंतर तो गाडी घेऊन सोलापूरला सासरवाडीला गेला आणि नंतर पुण्यात येऊन फिर्याद दिली.” त्याच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इम्रान चौधरी आणि त्याच्या मित्रांची सोलापूरमध्ये फसवणूक प्रकरणात चौकशी सुरू आहे. अकलुज, सोलापूर भागातील शेकडो लोकांना त्यांनी गंडा घातला आहे. ही रक्कम १२०० कोटी रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. पुण्यातही त्यांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी आल्या असून त्याची चौकशी सुरू आहे.
