पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी भूम शहरासाठी ‘अमृत २’ ही योजना अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन पाइपलाइनच्या माध्यमातून दररोज प्रतिमाणसी १३५ लिटर शुद्ध आणि निर्जंतुकीत पाणीपुरवठा करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
मंगळवार, दिनांक १० रोजी शहरातील साहिल कॉम्प्लेक्स येथे भूम पाणी कृती समितीची बैठक पार पडली. ही बैठक कृती समितीचे अध्यक्ष दिलीप गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी भूम नगरपालिकेचे माजी गटनेते संजय गाढवे, डॉ. रामराव कोकाटे, रोहन जाधव, अरुण देशमुख, ॲड. पंडित ढगे, प्रभाकर हाके, ॲड. रणजीत साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष तौफिक कुरेशी, संजय होळकर, नारायण वरवडे, पी. टी. जाधव, अमोल शिंदे, योगेश आसलकर आदींसह नागरिक, व्यापारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूम शहरात सध्या ४५०० नळ कनेक्शन असून आरसोली प्रकल्पातून ९० एचपी क्षमतेच्या मोटारद्वारे दररोज २२ तासांत सुमारे २० लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र शहराला प्रतिदिन ६७.५० लाख लिटर पाण्याची गरज आहे. त्यामुळे सध्याचा पाणीपुरवठा अपुरा पडतो आहे.
‘अमृत २’ योजनेत १७० एचपी क्षमतेची मोटार व नव्याने उभारण्यात येणाऱ्या फिल्टर प्लांटची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी काही काळ लागणार असला तरी त्याआधीच नळ कनेक्शन देण्याचे काम सुरू झाले आहे, जेणेकरून भविष्यात रस्त्यांची कामे करताना अडथळा निर्माण होणार नाही.
या योजनेत प्रत्येक नळ कनेक्शनसोबत मीटर बसविणे बंधनकारक आहे. संपूर्ण देशात ज्या नगरपालिकांनी ही योजना राबवली आहे, तिथे मीटर बसविण्यात आले आहेत. या पाणीपुरवठ्याचे दर नगराध्यक्ष व लोकनियुक्त सदस्य ठरवणार असून जनतेच्या हिताला प्राधान्य दिले जाईल.
१९७४ नंतर भूम शहरासाठी २००७ मध्ये ११ किमी लांबीची पाइपलाइन टाकून पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली होती. मात्र, अलीकडे झालेला शहराचा विस्तार आणि लोकसंख्येतील वाढ यामुळे ही पाइपलाइन अपुरी ठरू लागली आहे.
तसेच या पाइपलाइनमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याने अनेक भागांना स्वच्छ पाणी मिळत नाही. परिणामी आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
मात्र ही योजना वेळेत राबवली गेली नाही, तर भविष्यात १० ते १५ दिवसांतून एकदाच पाणी मिळण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ही योजना ही केवळ गरज नसून अत्यावश्यकता ठरली आहे. या योजनेबाबत काही विरोधकांकडून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे कृती समितीने नमूद केले.
हा विरोध आगामी नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रेरित असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या योजनेचा उद्देश म्हणजे सध्याच्या पाइपलाइनमधील गळती रोखून दररोज ४९.५० लाख लिटर शुद्ध पाणीपुरवठा करून प्रत्येक नागरिकाला दररोज १३५ लिटर पाणी मिळणे सुनिश्चित करणे.
केंद्र सरकार व राज्य शासनाने ही योजना देशातील पाणीटंचाईमुळे होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी आखली आहे. शहरातील पाणी कृती समिती, व्यापारी व नागरिकांनी एकत्र येऊन या योजनेविषयी सकारात्मक भूमिका घेतली असून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ही योजना तातडीने राबवावी, असा ठराव या बैठकीत घेण्यात आला.
भूमकरांनी दाखवलेली एकजूट ही शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच निर्णायक ठरेल.
