तीन महिन्यांनंतर चालकाला पकडण्यात काळेपडळ पोलिसांना यश : १५ लाखांचा माल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कामगारांच्या पगाराचे २१ लाख रुपये चोरून पळून गेलेल्या कारचालकाचा शोध घेण्यासाठी मिरजपासून बीड ते मुंबई असा मागोवा घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी मुंब्रा येथे काळेपडळ पोलिसांना यश मिळाले.
सलमान यासीन पठाण (वय ३२, रा. ईसा हाइट्स, ठाणे; मूळ रा. पाली, जि. बीड) असे या कारचालकाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून १५ लाख ६ हजार ४२० रुपयांचे सोन्याचे दागिने, रोकड, कार आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
याबाबत गिरीश अनिलचंद्र अग्रवाल (वय ४७, रा. क्लोव्हर व्हिलेज, वानवडी) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी सलमान पठाण याला कारचालक म्हणून कामावर ठेवले होते. कामगारांना पगार देण्यासाठी त्यांनी आपल्या कारमध्ये बॅगेत २१ लाख रुपये ठेवले होते.
२९ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता ते कोरिथॉन क्लबच्या पार्किंगमध्ये ओळखीच्या व्यक्तीशी बोलत असताना सलमान पठाण याने “गाडी शेडखाली पार्क करतो,” असे सांगितले आणि तेथून निघून गेला. पैशांची बॅग गाडीतच असल्याचे लक्षात येताच अग्रवाल गाडीपाशी गेले, पण तोपर्यंत सलमान पठाण गाडी उघडी ठेवून बॅग घेऊन पळून गेला होता. त्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद केला होता.
या काळात तो मिरज-सांगली, बीड, पुणे ग्रामीण, मुंबई, मुंब्रा, ठाणे परिसरात लपून वावरत होता. स्वतःचा मोबाईल न वापरता तो रस्त्यावरील अनोळखी व्यक्ती, रिक्षाचालक, कॅबचालक, हॉटेल वेटर आणि इतरांच्या मोबाईलवरून नातेवाईकांशी संपर्क करत असे. पोलीस पोहोचण्यापूर्वीच तो पळून जात असे.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस हवालदार प्रतीक लाहिगुडे यांनी आरोपीचे लोकेशन शोधले. त्यानुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, शाहिद शेख, प्रदीप बेडीस्कर यांनी सापळा रचून मुंब्रा येथील शिळडायघर पोलीस ठाण्याच्या परिसरात त्याला मित्राच्या मदतीने पकडले.
चोरी केलेल्या मालापैकी १५ लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने, कार आणि मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहिद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांनी पार पाडली आहे.
