परिमंडळ ५ मधील ९ पोलीस ठाण्यांच्या परिसरातून झाले होते गहाळ
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : परिमंडळ ५ मधील ९ पोलीस ठाण्यांच्या परिसरातून हरविलेले १७१ मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. हडपसर येथील मांजरी रोडवरील नेताजी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते हे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले.
परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील ९ पोलीस ठाण्यांकडील सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या पोर्टलवरून प्राप्त तक्रारी तसेच पुणे शहर पोलीस वेबसाईटवरील ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या पोर्टलवरील तक्रारींमधील १७१ हरविलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले होते.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सीईआयआर प्रणाली कशी कार्य करते, हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून वापरल्या जाणाऱ्या तांत्रिक पद्धती याबाबत सर्वसमावेशक माहिती दिली.
डॉ. शिंदे म्हणाले, ‘‘मोबाईल आजच्या युगात आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईल हरवला की व्यक्ती अस्वस्थ होते. अशा वेळी पोलिसांवर ठेवलेला विश्वास आम्ही योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतो.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी, विश्वासासाठी आणि सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.’’ यावेळी मोबाईल मिळालेल्या नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘‘मोबाईलच्या किंमतीपेक्षा आमच्या भावना अनमोल आहेत.
आमच्या आठवणी याच्याशी निगडीत आहेत. हे मोबाईल आम्हाला आमच्या जवळच्या व्यक्तींकडून भेट म्हणून मिळालेले आहेत. आमचा महत्वाचा डेटा मोबाईलमध्ये होता. हरविलेला मोबाईल परत मिळेल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती.
मात्र पोलिसांनी आमचे हरविलेले मोबाईल परत मिळवून दिल्यामुळे आमचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास वाढला आहे,’’ असे त्यांनी सांगितले. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी प्रास्ताविक केले. फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंभुराज जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, पोलीस अंमलदार संदीप राठोड, समीर पांडुळे, बापू लोणकर, माधुरी डोके, सोनाली कुंभार, विक्रम भोर, प्रकाश सावंत, सुनिल आव्हाड, स्वप्नील भुजबळ, तुकाराम झुंजार, अमोल दणके, महावीर लोंढे यांच्या पथकाने केली.
















