राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून कामाची प्रक्रिया सुरू : प्रवाशांना दिलासा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : प्रेमसंबंधातून गावावरून आपल्या प्रेयसीला पळवून आणल्याचा राग मनात धरून तरुणीच्या भावाने पुण्यात येत साथीदाराच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात वार करून त्याचा निर्घृण खून केला.
बार्शी बसस्थानकाची दुरवस्था दूर करण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून पुनर्बांधणीसाठी १० कोटी ७७ लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला असून, राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार दिलीप सोपल यांनी दिली.
आमदार सोपल पुढे बोलताना म्हणाले की, मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे बार्शी बसस्थानक पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या बसस्थानकांपैकी एक आहे. मात्र, असे असूनही येथील इमारत तसेच अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती.
खराब रस्ते आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवासी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर तसेच वर्तमानपत्रांमध्ये वारंवार प्रसिद्ध होणाऱ्या दुरवस्थेच्या छायाचित्रांसह बातम्यांची दखल घेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बसस्थानकाच्या समस्यांची सविस्तर माहिती दिली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी बीओटी (BOT) तत्त्वावरील प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित होता. मात्र, त्याची फिजिबिलिटी नसल्याने पुढील कार्यवाही होऊ शकली नव्हती. “तेव्हा होईल तेव्हा होऊ द्या, पण सध्याची दुरवस्था पाहवत नाही,” अशी ठाम भूमिका घेत शासनाने स्वनिधीतून तातडीने दुरुस्ती व पुनर्बांधणी करावी, अशी मागणी लावून धरल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत आदेश देऊन निधी मंजूर केला, असे आमदार सोपल यांनी सांगितले.
या निधी मंजुरीबद्दल आमदार दिलीप सोपल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले. तसेच, बसस्थानक चौकात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एस.टी. आगारात येणाऱ्या बसेससाठी वेअरहाऊस रोडच्या बाजूने स्वतंत्र प्रवेशद्वार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार भिंत पाडून गेट बसवण्यात आले असून, हे प्रवेशद्वार लवकरच सुरू करण्याची कार्यवाही केली जाईल, असेही आमदार दिलीप सोपल यांनी स्पष्ट केले.



















