धाराशिव जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून जल्लोष; विद्यार्थी प्रश्नांना मिळणार नवे नेतृत्व
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
धाराशिव : भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI) संघटनेने धाराशिव जिल्ह्यासाठी नव्या नेतृत्वाची घोषणा करत ॲड. मुशरफ अल्ताफ सय्यद यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
NSUI चे राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार आणि राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके, महाराष्ट्र प्रभारी अक्षय यादव क्रांतिवीर आणि कांता ग्लावा यांनी नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रसिद्ध केले.
ॲड. मुशरफ अल्ताफ सय्यद यांची निवड ही त्यांच्या संघटनेप्रती असलेल्या निष्ठा व सक्रिय कार्याचा गौरव मानली जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या, शैक्षणिक सोयी-सुविधा आणि महाविद्यालयीन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना ॲड. सय्यद म्हणाले, “राष्ट्रीय आणि प्रदेश नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी निश्चितच सार्थ ठरवीन. धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचा आवाज बुलंद करणे आणि संघटनेची ध्येयधोरणे शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल.”
या निवडीनंतर धाराशिव काँग्रेस व NSUI च्या वतीने त्यांचे ठिकठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा NSUI अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.















