‘सूर्यरत्न – द मॉडर्न सेंट ऑफ इंडिया’ उपाधीनेही गौरव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : प्रेम, मैत्री, करुणा आणि जागतिक शांततेचा संदेश देत मानवी मूल्यांची जोपासना करणारे प्रेमावतार मैत्रीबोध दादाश्री महाराज यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या वतीने वर्ष २०२६ चे ‘Suryadatta Global Life Time Achievement Award’ आणि ‘Global Peace Ambassador Award – 2026’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी दादाश्रींनी दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांच्या हस्ते हा प्रेरणादायी सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे दादाश्रींच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना सूर्यदत्त समूहाची सर्वोच्च विशेष उपाधी ‘Suryaratn – The Modern Saint of India’ प्रदान करण्यात आली.
‘सूर्यरत्न’ ही उपाधी यापूर्वी देश-विदेशातील अनेक आध्यात्मिक विभूतींना प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये श्री श्री रविशंकर, ज्ञानवत्सल स्वामी, स्वामी गोविंद देव गिरी, स्वामी चिदानंद सरस्वती तसेच राकेशभाई झावेरी यांसारख्या विभूतींचा समावेश आहे. त्या गौरवशाली परंपरेत प्रेमावतार मैत्रीबोध दादाश्री यांचा समावेश झाल्याने सूर्यदत्त समूहासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला.
सूर्यदत्त समूहाच्या वाटचालीतील हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा ठरला. हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता अध्यात्म आणि आधुनिक विचारसरणी यांचा समन्वय अधोरेखित करणारा ठरला.
विशेष म्हणजे प्रथमच प्रदान करण्यात आलेल्या ‘Global Peace Ambassador Award – 2026’ मुळे या सन्मानाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. दादाश्रींनी सन्मान स्वीकारताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
उपस्थित मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी उभे राहून (स्टँडिंग ओव्हेशन देत) दादाश्रींच्या जागतिक शांततेसाठीच्या कार्याला मानवंदना दिली.आजच्या स्पर्धात्मक युगात माणसातील ‘मानवता’ कमी होत चालली आहे. अशा वेळी दादाश्रींचे विचार समाजाला अंतर्मुख करतात. त्यांच्या शब्दांत मानवातील सुप्त करुणा जागृत करण्याची ताकद आहे.
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रेम, करुणा आणि मानवी मूल्यांची रुजवणूक होणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रेमावतार मैत्रीबोध दादाश्री म्हणाले की, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसारख्या प्रतिष्ठित संस्थेकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरव नसून मोठी जबाबदारी आहे.
आजच्या पिढीला केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर प्रेम, मैत्री आणि शांततेची दृष्टी देणे ही काळाची गरज आहे. मैत्रीबोध परिवाराचा मुख्य हेतू समाजसुधारणा आणि नवीन पिढीला योग्य मार्गदर्शन करणे हा आहे. त्याच मार्गावर सूर्यदत्त समूहही कार्यरत असल्याचे पाहून आनंद होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“सूर्यदत्त आणि मैत्रीबोध या दोन्ही संस्था अध्यात्म आणि शिक्षणाच्या माध्यमातून मानवी मूल्यांची जोपासना करत आहेत. मानवी एकता आणि जागतिक शांतता हेच आपले अंतिम ध्येय असून या प्रवासात आपण सर्वजण एकत्र आहोत,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी संपूर्ण सभागृह सकारात्मक ऊर्जा आणि शांततेच्या वातावरणाने भारावून गेले होते.
आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे प्रगती होत असली तरी मनःशांती हरवत चालली आहे. अशा अस्थिर आणि तणावपूर्ण वातावरणात प्रेमावतार मैत्रीबोध दादाश्री प्रेम, करुणा आणि निस्वार्थ सेवेचा जो दीप प्रज्वलित करत आहेत, ते कार्य खरोखरच वंदनीय आहे. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन















