महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पॅरिस : मागील टोकियो ऑलिम्पिकमध्ये मध्ये बिघडलेल्या पिस्तूलचे शल्य दूर करत भारताची युवा नेमबाज मनू भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकतालिकेची सुरूवात केली. १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत २२ वर्षीय मनूने कांस्य पदकाची कमाई केली. मनू ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाजही ठरली.
मनूच्या या शानदार कामगिरीसह ऑलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या पदकांचा १२ वर्षांचा दुष्काळही संपला. लंडन ऑलिम्पिकमध्ये २०१२ साली विजय कुमारने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत रौप्य, तर गगन नारंगने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्य जिंकले होते.
रिओ २०१६ आणि टोकियो २०२१ ऑलिम्पिकमध्ये मात्र भारतीय नेमबाज रिकाम्या हातांनी परतले होते. यासह ऑलिम्पिक पदक मिळवणारी मनू ही अभिनव बिंद्रा, राज्यवर्धनसिंग राठोड, विजय कुमार आणि गगन नारंग यांच्यानंतरची पाचवी भारतीय नेमबाज ठरली.
आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत मनूने २२१.७ गुणांचा वेध घेतला. जेव्हा ती तिसऱ्या स्थानासह बाहेर पडली, तेव्हा दक्षिण कोरियाच्या येजी किमच्या तुलनेत मनूचे गुण केवळ ०.१ ने कमी होते. पुढे येजीने २४१.३ गुणांसह रौप्य, तर दक्षिण कोरियाच्याच जिन ओह हिने २४३.२ गुणांसह ऑलिम्पिक विक्रम नोंदवत सुवर्ण पदक पटकावले.
बॉक्सिंग ते नेमबाजी
जीवनात मनूने टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग स्पर्धामध्ये सातत्याने भाग घेतला. यात बॉक्सिंगची तिला विशेष आवड होती. तसेच, ‘थान टा’ या मार्शल आर्टमध्येही तिने चमकदार कामगिरी केली आहे. परंतु, एका बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान डोळ्यावर झालेल्या दुखापतीमुळे ती या खेळापासून दूर झाली आणि नंतर तिने पिस्तूल हाती घेत नेमबाजीमध्ये यशस्वी मार्ग पकडला.
मनूच्या यशामध्ये तिच्या आईची भूमिका निर्णायक ठरली आहे. मनूची आई सुमेधा भाकर यांनी आपल्या मुलीच्या सरावात खंड न पडण्यासाठी नोकरी सोडली. त्या एका शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. परंतु, मनूच्या भविष्यासाठी त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि आज देशाला ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज गवसली.
दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या मनूने आपल्या पहिल्याच स्पर्धेत यश मिळवले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीदरम्यान पिस्तूल बिघडल्याने तिला नाईलाजाने माघार घ्यावी लागली होती. यावेळी निराश झालेल्या मनूला अश्रू रोखणे कठीण झाले होते.
ती या स्पर्धेत पदकाची प्रबळ दावेदार होती. यानंतर मनूने मानसिकरीत्या स्वतःला सक्षम केले आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कसर भरून काढली. टोकियोतील अपयशानंतर मी खूप निराश झालेली आणि यातून सावरण्यात मला खूप कालावधी लागला. पण, आज मी किती आनंदीत आहे हे सांगू शकत नाही. मी माझ्या पूर्ण ऊर्जेने लढत होती.
कांस्य पदक जिंकू शकले, याचा आनंद आहे. मी भगवद्गीता वाचलंय आणि त्यात श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष देताना कोणत्याही फळाची अपेक्षा करण्यास सांगितले नाही. अंतिम फेरीदरम्यानही माझ्या मनात हेच विचार सुरू होते. अशी भावना- मनू भाकरने व्यक्त केली.
भाकरने भारतासाठी पहिले पदक जिंकून अप्रतिम कामगिरी केली. कांस्य पदक जिंकणाऱ्या मनूचे खूप अभिनंदन. नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू असल्याने तिचे हे यश खूप खास आहे. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले.
