रेल्वे कृती समितीचे खा. ओमराजें मार्फत रेल्वेमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : शेगाव ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग करण्यात यावा, अशी मागणी भूम-परंडा-वाशी रेल्वे कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. ५) या बाबत निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेल्या शेगाव ते पंढरपूर या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या उर्वरित कामांना मंजुरी देऊन तातडीने रेल्वेसेवा सुरू करण्यात यावी.
यामुळे खामगाव, जालना, गेवराई, वाशी, भूम, परंडा, कुडुवाडी ही शहरे या रेल्वेमार्गावर येऊन पुढे पंढरपूरमार्गे थेट कोल्हापूरपर्यंत जोडली जाणार आहेत. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी कृती समितीच्या वतीने खा. ओमराजे यांच्यामार्फत रेल्वेमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे दिलीप शाळू, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे परंडा विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, डीसीसी बँकेचे संचालक संजय पाटील आरसोलीकर, तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड. रामराजे साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप देशमुख, आदिनाथ पालके, अलीम शेख, वसंत यादव, दिगंबर ढगे, अमृत भोरे, फैजान काजी, पांडुरंग धस, संतोष वराळे, अॅड. रमेश काळे, अतुल शेळके, श्रीराम खंडागळे यांच्यासह पत्रकारही यावेळी उपस्थित होते.
