राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक : मानांकनात १२० गुणांची भर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्रातील उदयोन्मुख टेबल टेनिसपटू राजवर्धन तिवारी याने अलीकडील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेला राजवर्धन राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर होता. मात्र, ताज्या कामगिरीनंतर तो आता राष्ट्रीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याच्या मार्गावर आहे.
वडोदरा (गुजरात) आणि पंचकुला (हरियाणा) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धांमध्ये राजवर्धनने उत्कृष्ट खेळ करत दोन्ही ठिकाणी कांस्यपदक पटकावले. त्यानंतरच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत त्याने दमदार खेळाची मालिका कायम ठेवत अंतिम फेरी गाठली.
उपांत्यपूर्व फेरीत त्याने पश्चिम बंगालच्या हृदान बिस्वास याच्यावर ३-० (१३-११, ११-७, ११-९) असा सरळ विजय मिळवला. उपांत्य फेरीत देवांशू चक्रवर्ती याच्यावरही ३-० (११-८, ११-७, ११-६) असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात अव्वल मानांकित राजदीप बिस्वास याच्याविरुद्ध राजवर्धनला ०-३ (१०-१२, ४-११, ६-११) अशी हार पत्करावी लागली. तरीही या स्पर्धेत मिळवलेल्या रौप्यपदकामुळे त्याच्या मानांकनात १२० गुणांची वाढ झाली आहे.
नवीन मानांकनानुसार, राजदीप बिस्वास ५७० गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून राजवर्धन तिवारी व सात्विक शर्मा प्रत्येकी २७० गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. देवांशू चक्रवर्ती २२५ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
राजवर्धन सध्या बार्शी येथील बार्शी टेबल टेनिस अकादमी येथे नियमित प्रशिक्षण घेत आहे. तसेच, त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहता त्याची वर्ल्ड कॅडेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे, ही त्याच्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे.
राजवर्धनच्या या यशामागे त्यांचे मार्गदर्शक गणेश स्वामी यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या प्रशिक्षणामुळेच त्याने ही उंची गाठली आहे. भविष्यात तो आणखी मोठे यश मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



















